अखेर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये झाली चर्चा; वाचा दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे सध्या गुजरातच्या सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत ३० आमदारही आहे. हा शिवसेनेसह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. आता ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसमोर काही अटी ठेवल्या आहेत.

या आटी शिवसेनेला मान्य नाहीत असं सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंची नाराजी दुर करण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सुरतला पोहोचले आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली. या चर्चेत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर संतापले, म्हणाले, तुम्ही तुमचं ठरवा मी माझं ठरवतो.

एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेतेपदावरून काढलं असं का केलं? असा जाब त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट किंवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावरून का काढलं? असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

संजय राऊतांबाबत ते म्हणाले की, संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात मग प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायत. प्रसारमाध्यमांसमोर वेगळं का बोलतायत? असा सवालही त्यांनी विचारला. हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजप युती व्हावी हा आपला मुद्दा आहे. मी कुठल्याही पक्षाविरोधी कारवाई केली नाही तरीही गटनेते पदावरून काढलं.

काही नेते माझ्याशी फोनवर बोलतायत पण प्रसारमाध्यमांसमोर वेगळं का बोलतायत? शिवसेनेचे नेते माझ्याशी चर्चा करायला येत असतील तर बाकीच्या नेत्यांना त्याची कल्पना नाही का? असं ते उद्धव ठाकरेंना म्हणाले. जवळपास १५ मिनीटे हा संवाद चालला. उद्धव ठाकरे काय म्हणाले? याबाबत अदयाप माहिती मिळालेली नाही. पण एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत हे मात्र नक्की आहे.