सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. राजपूत यांच्या दाव्याने आणखीनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत येण्याचे आवाहन केले होते. पण तसे काही घडले नाही. अशातच आता उदयसिंग राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
राजपूत यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे की, ‘मला शिवसेनेतून बंडखोरी करण्यासाठी 50 कोटींची अधिकची ऑफर होती. माझ्या जवळ दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही आहे. असं असलं तरी देखील, मी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. अगदी 100 कोटी दिले तरी मी गद्दारी करणार नाही,’ असं राजपूत म्हणाले आहेत.
दरम्यान, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही.
मात्र शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या सभागृहातच एकनाथ शिंदे यांच्या नव्या गटाला मान्यता मिळू शकते.