काल देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामधील चार राज्यात भाजप आघाडीवर असून, पंजाब मध्ये आम आदमी पक्ष आपले सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. या सगळ्यात गोवा राज्याचा निकाल सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेनेने यावेळी उत्तर प्रदेश आणि गोवा या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही ठिकाणी शिवसेनेला जबर धक्का बसला. गोव्यात शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राबवू असं म्हणणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मतदारांनी नाकारलं आहे.
गोव्यात शिवसेनेच्या उमेदवारांना तर नोटापेक्षाही कमी मतं मिळाली यामुळे या गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे. विरोधकांनी या गोष्टीवरून शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र गोव्यातील या निकालात शिवसेनेसाठी एक सकारात्मक गोष्ट घडली आहे. शिवसेनेचे उमेदवार गोविंद गोवेंकर यांना सर्वाधिक म्हणजे 342 मतं मिळाली आहेत.
गोविंद गोवेंकर यांना 342, भक्ती खडपकर 55 ,बबली नाईक116, सुभाष केरकर 222, जितेश कामत 123,गुरुदास गावकर 265, सागर धरगलकर-97, करिश्मा फर्नांडिस 166, देविदास गावकर 183, मारूती शिरगावकर 71 अशी शिवसेना उमेदवारांना मिळणारी मतं आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25 टक्के मत वाटा मिळालाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहे. 1.17 टक्के मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडला आहे.
तर दुसरीकडे, गोव्यात भाजपने 20 जागांवर आघाडी घेतली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या मदतीला तीन अपक्ष आणि मगो पक्षाचे दोन आमदार धावले आहेत. याठिकाणी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.