पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता आणि काॅंग्रेस विचारतेय हाऊ इस द जोश? स्मृती इराणी भडकल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटिंडा दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप करत भाजपने पंजाब सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांच्यावर जोरदार प्रहार केला. स्मृती इराणी म्हणाल्या की पीएम मोदींच्या जीवाला २० मिनिटे धोका होता आणि काँग्रेस विचारत होती की हाउ इस द जोश?

पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल करताना स्मृती इराणी यांनी अनेक प्रश्न विचारले. स्मृती इराणी म्हणाल्या, ‘काँग्रेस मोदींचा द्वेष करते हे आम्हाला माहीत आहे. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पीएम मोदींच्या ताफ्याची सुरक्षा बिघडत असताना काँग्रेस नेते आनंदाने उड्या मारत होते. जोश कसा आहे ते विचारत होते. हा कोणत्या प्रकारचा उत्सव आहे?

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींची सभा पुढे ढकलल्यानंतर श्रीनिवास बीवी यांनी भाजपला टोला लगावला होता. श्रीनिवास यांनी दावा केला होता की, फिरोजपूरच्या सभेत ठेवलेल्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या, त्यामुळे पंतप्रधान मोदींना परतावे लागले. श्रीनिवास यांनी ट्विट करून लिहिले, ‘ हाउ इस द जोश.’

आंदोलनामुळे पंतप्रधान पंजाबमधील उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटे अडकले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी असल्याचे मानले असून याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर फिरोजपूरमध्ये होणारा पंतप्रधानांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

पंतप्रधान ४२,७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार होते, ज्यात फिरोजपूरमधील चंदिगड स्थित पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) चे ‘सॅटेलाइट सेंटर’ आणि दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे. त्यानंतर एका सभेला संबोधित करणारा कार्यक्रम होता.