एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सेनेत उभी फुट पडली. सत्तेतून बाहेर पडत आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बंड करणारे एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत.
शिंदे यांच्या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर झालं. त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. 40 आमदारांसह अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.
आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक देखील शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यातच भाजपनं ऑपरेशन लोटसद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे आमदार फोडत सत्ता मिळवली आहे.
नुकतीच महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सत्ता मिळवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता भाजपच्या निशाण्यावर झारखंड राज्य असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस होईल, असं भाजप नेत्याने म्हंटलं होतं. मात्र अशातच आता झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना भट्टाचार्य यांनी म्हंटलं आहे की, ‘झारखंडमधील भाजपचे 16 आमदार आमच्या संपर्कात असून ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असं मोठं वक्तव्य भट्टाचार्य यांनी केलं आहे.
पुढे बोलताना आमचा पक्ष 16 आमदारांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी भट्टाचार्य यांचा दावा फेटाळला आहे. खोट्या गोष्टी सांगून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं शाहदेव यांनी स्पष्टच म्हटलं आहे.