भाजपच्या यशामागील नेमकं रहस्य काय? असा सवाल सध्या अनेकांना उपस्थित झाला आहे. अशातच भाजप आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. राज्यसभा निवडणूक काँग्रेसने शिवसेनेला मदत केली नसल्याच शेलार यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, ‘भाजपाकडे 113 मतांचा कोटा असताना 123 मते कशी व कुठून आली?, शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक पडली. नेत्याची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी यांच्या ३ पक्षातील समन्वयाचा अभाव प्रखरतेने स्पष्ट केला आहे. या ट्विटमध्ये शेलार म्हणतात, ‘MIM ची मते घेऊन औरंगजेबी युती अखेर केलीच, आता औरंगाबाद नामांतराचे काय?,’ असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून शिवसेनेला केला आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. काल झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.