स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या सर्वांच्या पसंतीची बनली आहे. या मालिकेतील अरुंधतीने म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकरने तर आपल्या अभिनयातून सर्वांनाच भुरळ पाडली आहे. नुकतीच हीच मधुराणी एका वेगळ्या कारणावरून सोशल मिडियावर चर्चेत आली आहे.
मधुराणीने आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तीने आपल्या मुलीचा वाढदिवस कशा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे हे सर्वांना सांगितले आहे. मधुराणीची ही अनोखी पध्दत पाहून चाहत्यांनी तीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
आपल्या पोस्टमध्ये मधुराणीने म्हणले आहे की, “एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सर्विससाठी कर्णबधीर मुलं आणि बेकर्स ऑटिस्ट हे ( मतिमंद )मुलं? ऐकूनही आश्चर्य वाटलं ना? आणि हे रेस्टॉरंट आहे तुकाराम पादुका चौक, फर्ग्युसन रोड, पुणे येथे. ही संकल्पना आहे कॅन्सरवर काम करणाऱ्या एका तरुण आणि हरहुन्नरी डॉक्टर डॉ. सोनल कापसे हिची आणि तिला साथ देत तिथे खंबीरपणे उभा असतो तिचा नवरा शैलेश केदारे”
“डॉ. सोनम कापसे यांनी समानतेच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. एक हेल्थकेअर innovation आणि research expert, शेतकरी आणि अपंग तरुणांना घेऊन “टेरासिन”ची संकल्पना सुरू केली,”
अशी माहिती मधुराणीने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मधुराणीने सांगितले आहे की, “दरवर्षी स्वरालीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी आमची इच्छा असते. यावर्षी स्वरालीला मित्र मैत्रिणींबरोबर cooking करायचं होतं, त्यामुळे तशी जागा शोधत असताना प्रमोदला हे रेस्टॉरंट सापडलं आणि मुलांनी एक वेगळं जग पाहिलं. त्यांनी कूकिंग केलं , गेम्स खेळले, sign language शिकले…. आणि हे सगळं प्रमोदच्या कल्पनेतून आणि डॉ. सोनल यांच्या मदतीने शक्य झालं.”
“इथल्या बेकरीमध्ये ऑटिस्ट मुलं काम करतात आणि आपल्याला ही लाजवतील अतिशय उत्तम बेकरी प्रोडक्ट बनवतात. इथली कर्णबधिर मुलं, मुली ही १००% अपंग आहेत. शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि ही माता त्यांची राहायची सुद्धा सोय स्वतः च्या जीवावर करते. इथे world cuisine म्हणजेच ( जागतिक पदार्थ ) मिळतात आणि इथल्या पदार्थांसाठी वापरले जाणारे सर्व जिन्नस थेट शेतातून येतात.”
तसेच, “पुण्याच्या जेवणात आरोग्य आणि चव वाढवण्यासाठी जागतिक पदार्थ बनवण्यासाठी तिने नाचणी, ज्वारी, कोडो, बारनयार्ड, राजगिरा यांसारखे स्थानिक वडिलोपार्जित धान्य घेण्याचे ठरवले. प्रिझर्व्हेटिव्ह, रंग आणि ऍडिटीव्ह नसलेले पदार्थ तुम्हाला इथे मिळतील.” अशी माहिती ही मधुराणीने यावेळी दिली आहे.
याचबरोबर, “हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. इतके वेगवेगळ्या डिशेस त्यांनी दिल्या आणि आम्ही सगळेच नेहमी पेक्षा खूप जास्त जेवलो पण तरीही कुठेही जडपणा, तडस लागणे हा अनुभव नाही. डॉ.सोनम कापसे यांचा विश्वास होता की दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे तर सन्माननीय व्यासपीठ आणि सुरक्षित भविष्य हवे म्हणून यांनी त्यांना महाराष्ट्रच्या जनतेसमोर आणण्याचे ठरवले. हे फक्त रेस्टॉरंट नाही तर एक अनुभव आहे.” अशा शब्दात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.