राज्यात सत्तांतरानंतर अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाविरुद्ध उध्दव ठाकरे गट असा संघर्ष सध्या राज्यात सुरू आहे. दोन्ही गटात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
राणे घराणे आणि ठाकरे घराणे यांच्यात नेहमीच वाद प्रतिवाद होताना दिसतात. नितेश राणे यांनी आता एक ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
नितेश राणेंनी त्यांचे वडील नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांचे व्याजासह वस्त्रहरण सुरू करू असा इशारा दिला आहे.
नितेश राणे यांनी ट्विट केले आहे, त्यात लिहिले की, एकनाथ शिंदे जींप्रमाणे.. माझ्या वडिलांनी सेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेक “सुपारी” दिल्या गेल्या.. तथाकथित विवेकी- सभ्य पक्षप्रमुखाने! म्याऊ म्याऊ संपू दे.. मग आपण व्याजासह “वस्त्रहरण” सुरू करू.
Just like Eknath Shinde ji .. several “suparis”were given to finish my father when he left the Sena.. by the so called sober and decent Paksha Pramukh!
Let the meow meow finish.. then we will start with the “Vastraharan” with interest 😊— Nitesh Rane (@NiteshNRane) July 23, 2022
दरम्यान, दुसरीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना नेमकी कोणाची यावरून वाद सुरू आहे. तो मुद्दा आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट महिन्याच्या आठ तारखेपर्यंत दुपारी एकवाजेपर्यंत कागदपत्रे जमा करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे कागदपत्रे सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोग त्यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.