एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. यावर आता एकनाथ शिंदे यांनी हे बंड का केलं? नेमकी ठिणगी कुठे पडली, ट्रिगर पॉईंट कोणता होता, याबद्दल सर्वांनाच प्रश्न आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बंड करण्यामागे ट्रिगर पॉईंट कोणता होता, बंड का केलं याबाबत भाष्य केलं. म्हणाले, ट्रिगर पॉईंट विचारत असाल तर ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटायची आणि कोणीतरी शहीद व्हायचं. माझ्यासोबत आलेली ही ५० लोकंच माझ्या मागे लागली होती.
तसेच एकनाथ शिंदे म्हणाले, २०१९ ला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यानंतर जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तोच आम्हाला मान्य नव्हता. त्यावेळी पक्षाचा आदेश म्हणून ते मान्य केलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे कार्यकर्ते. नेतृत्वाचा निर्णय झाला म्हणून आम्ही काम करू लागलो. पण खूप आमदारांची महाविकास आघाडीला मान्यता नव्हती.
२०१९ ला बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे फोटो लावूनच निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेने युतीलाच कौल दिला होता. पण समीकरण बदललं, दुसरं गणित झालं ते आम्ही दुरूस्त केलं. ट्रिगर पॉईंट विचाराल तर रोज सुरू होतं. ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटल्यानंतर कुणी तरी शहीद होत होतं. जे झालेले ५० लोकंच माझ्या मागे लागले होते.
महाविकास आघाडीत शिवसैनिकांना त्रास होतो आहे, त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. आमदारांच्या मतदारसंघात जाऊन आमच्याच घटकपक्षातले लोक कार्यक्रम करत होते. भूमिपूजन करत होते. तसंच बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका यांची गळचेपी होत होती, असे शिंदे म्हणाले.
शिंदे सरकारवर खोके अशी टीका होते, यावर शिंदे यांना प्रश्न केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका करत उत्तर दिलं. म्हणाले, जे बोलतात त्यांना तो अधिकार आहे? जे ५० लोकं आहेत त्यातले अनेकजण २५-३०, ४० वर्षे काम केलं आहे. जे आमच्यावर टीका करतात त्यांना किती अनुभव आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही ही लढाई लढलो. खोक्याबिक्यांबाबत बोलणारे कोण आहेत? मी त्यात आता पडत नाही. असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना ठाकरे काय उत्तर देतील पाहावं लागेल.