एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यामुळे आता शिवसेनेसह आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्षाने आपला जनाधार वाढवण्याचे काम सुरू केले आहे.
आपल्या पक्षात अनेक नेत्यांना आणि संघटनांना घेण्याची चढाओढ पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव चर्चेत आले आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येणार का, या मुद्द्यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यावर आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, भविष्यात जर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येत असतील तर आनंदाचीच बाब आहे. आज भारताचे संविधान हे डॉक्टर बाबासाहेबांची मोठी देणगी आहे.
या संविधानावर हल्ला होत आहे. खरंच लोकशाही शिल्लक आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता ज्यांना ज्यांना वाटतं की भारताचे संविधान सुरक्षित व्हावं, देशाची जातीय अवस्था निर्मूलन होवून न्याय व्यवस्था उभी राहावी, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं.
दरम्यान, एमएमआरडीएने बिकेसीची शिंदे गटाला परवानगी दिल्यानंतर सावंत बोलतांना म्हणाले की शिवतीर्थासाठी शिवसेनेचा पहिला अर्ज आहे. तरीही असं होतं असेल तर हे गलिच्छ राजकारण आहे, थांबवले पाहिजे. दरम्यान शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी ठाम भूमिका सावंत यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर देखील टोला लगावला होता. अनुराग ठाकूर यांनी मुंबईतील महिला आणि मुलांना शौचालये नसल्यामुळे अवस्थेत जगावं लागतं असं वक्तव्य केले होते. त्यावर सावंत म्हणाले, अनुराग ठाकूर यांना मुंबई तरी माहिती आहे का? मुंबईत खूप चांगल्या पद्धतीचे शौचालये आहेत. निवडणूका जिंकण्यासाठी कसलेही मार्ग अवलंबता.