Share

‘उद्धव ठाकरेंना शाखांवर जावं लागतंय ही सगळ्यात वाईट परिस्थिती’- गुलाबराव पाटील

सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिंदे गटात सामील झालेले जळगाव जिल्ह्यातील आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतीच आदित्य ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज नाशिकच्या मनमाड येथे पोहोचली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते,असा घणाघात आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर केला.

या पार्श्वभूमीवर जळगावातील पत्रकारांनी गुलाबराव पाटलांना प्रश्न विचारले. त्यावर गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. म्हणाले, आदित्य ठाकरे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत, पण हाच महाराष्ट्र दौरा जर सत्तेत असताना केला तर असता तर आज ओढावलेली परिस्थिती टळली असती.

तसेच म्हणाले, उद्धव ठाकरेंची तब्येत खराब होती, पण आदित्य ठाकरे ३० वर्षांचे तरुण आहेत. जर त्यांनी राज्यभर शिवसेनेसाठी दौरा केला असता तर त्यांच्यावर आज आलेली वेळ आली नसती. आज उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावं लागतंय, ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे.

ठाकरे बापलेकांनी असे दौरे आधी केले असते तर शिवसेना आणखी मजबूत झाली असती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मजबूत झाला असता. याचसाठी आम्ही सगळ्या ४० आमदारांनी उठाव केला. यानिमित्ताने मी खात्री देतो, शिवसेनेला गतवैभव पुन्हा प्राप्त करु असे पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना राजीनामा द्या मग बघू असे चॅलेंज दिले, त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ओरिजिनल शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमच्या राजीनाम्याचा विषयच येत नाही. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now