पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या अनेक हत्याकांड केले जात आहेत. आता पुण्यातील नाना पेठ परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणाची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे.
पुण्यातील नाना पेठ परिसरात तरुणाची तब्बल ३५ वार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना २७ तारखेच्या रात्री एक वाजता घडली आहे.
हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अक्षय वल्लाळ आहे. त्याची हत्या ही पूर्ववैमनस्यातून झाली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतुल गंगाधर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वल्लाळ याची समाजात प्रतिमा चांगली असल्याने महेश बुरा आणि किशोर शिंदे यांच्यात पूर्वीपासून वाद होता. नवा वाडा येथील लाँड्रीच्या समोर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि अक्षय वल्लाळ हे थांबले असताना महेश बुरा आणि किशोर शिंदे तेथे आले.
त्यांनी पूर्ववैमनस्यातून अक्षयवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या डोक्यात सिमेंट कॉक्रीटचा दगड घालून त्याचा खून केला. त्याच्या वाचविण्यासाठी अतुल गेला असताना महेश बुरा याने त्यांच्याही डोक्यात कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी महेश नारायण बुरा आणि किशोर अशोक शिंदे यांना अटक केली आहे. सध्या पोलीस निरीक्षक उल्हास कदम अधिक तपास करीत आहेत. मात्र, अक्षय वल्लाळ याच्या हत्येने पुणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.