sushma andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या आता राज्याच्या राजकरणात चांगल्याच सक्रिय झालेल्या पाहायला मिळतं आहे. ठाकरे गटाचा झालेला दसरा मेळावा आणि त्या मेळाव्यात अंधारे यांनी केलेलं भाषण चर्चेचा विषय बनला आहे. तेव्हापासून सुषमा अंधारे शिंदे गटातील नेत्यांवर टिकास्त्र सोडत आहेत.
हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतच पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेनेने प्रबोधन यात्रेची आखणी केली आहे. यानिमित्ताने नुकतीच ठाकरे गटाची सभा नवी मुंबईत पार पडली.
सभेत बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे की, गद्दार आमदारांकडून उद्धव ठाकरेंची बदनामी केली जातं आहे. मात्र जर बदनामी कराल, काहीबाही विषयांवरुन उद्धव ठाकरेंकडे बोट कराल तर व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशेब चुकता करेल,’ असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
सभेत बोलताना पुढे सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांना लक्ष्य करताना म्हंटलं आहे की, भाजपसोबत जायचंच होतं. मग कशाला हिंदुत्व अन् निधीची कारणं सांगत बसलात. अनैसर्गिक युती होती असं म्हणता मग ज्यांच्याबरोबर गेलात त्यांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी केलाच होतात की…’
‘आता राहिला प्रश्न तो निधीचा. मग अजित पवार ज्यावेळी विधान भवनात दिलेल्या निधीची यादी वाचत होते, त्यावेळी शिंदेंच्या गटातील आमदार का शांत होते? त्यांनी अजितदादांचं म्हणणं का खोडून काढलं नाही?,’ असे संतप्त सवाल सुषमा अंधारे यांनी या सभेतून उपस्थित केले.
दरम्यान, तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांना धमक्या येत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वताच पत्रकारपरिषदेत या गोष्टीचा खुलासा केला आहे. सध्या सुषमा अंधारे या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. अशातच नुकतच त्यांनी शिंदे गटाला इशारा दिल्याने आणखीनच भर पडली आहे.