विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारवर आरोप करत असताना, विधानसभा अध्यक्षांकडे पेन ड्राइव्ह दिला होता. या पेन ड्राइव्हमध्ये सव्वाशे तासांचा डेटा असून सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ‘एबीपी माझा’ शी संवाद साधत असताना फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. म्हणाले, मी असं समजत होतो की, देवेंद्र फडणवीस हे मैदानी खिलाडी आहेत. परंतु, त्यांचा दिलेरपणा दिसला नाही. त्यांचा मैदानीपणाही दिसला नाही. त्यांनी जी टेप सभापतींना दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेमध्ये म्हणायचं असेल, तर गांडूचं राजकारण केलं आहे.
तसेच म्हणाले, सभागृहातील आरोपांतून फारसं साध्य होणार नाही. सभापती फार तर त्यांचे आरोप फेटाळून लावतील. मात्र, त्यांनी हाच पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. फडणवीसांनी जे बोलावं ते स्पष्ट बोलावं.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहापेक्षा हा पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. त्या पेनड्राईव्हमध्ये काय ‘गुलकंद’ आहे? तेही फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे आणि ते जनतेसमोर आले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणावर काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर pic.twitter.com/io2TVWkLaF
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 13, 2022
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरती मोठा आरोप केला आहे. आपल्याला आणि आंबेडकरवाद्यांना पाडण्याचं राजकारण काँग्रेसने आत्तापर्यंत केले, आणि ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोडचूक आहे. काँग्रेसने चळवळच संपविल्यामुळे मुस्लिम आणि दलितांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसपुढं मैत्रीचा हात देखील दाखवला. म्हणाले, आताही काँग्रेसनं समझोत्याचं राजकारण केलं नाही तर जे व्हायचं ते होईल. राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र राहात नसल्याने आपण मैत्रीचा हात काँग्रेससमोर ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिशा सालियन प्रकरणाबाबत देखील वक्तव्य करून, शिवसेना आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना देखील टोला लगावला.