एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेत उभी फुट पडली आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षाचा व्हीप झुगारल्याप्रकरणी 16 आमदारांचे निलंबन करण्याची मागणी शिवसेनेनं केलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गद्दारी करणाऱ्यांविरोधात आता शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. शिंदे गटाला समर्थन दिलेल्या नेत्यांची शिवसेनेने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
पक्षाविरोधात कारवाया केल्याचा ठपका ठेऊन शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबद्दल सेनेच्या कार्यालयातून पत्रक काढले आहे. यामुळे आता अधिकच वातावरण तापलं आहे.
दरम्यान, अधिवेशनामध्ये उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली होती. महाविकास आघाडीत सहभागी होणे हीच खरी गद्दारी असल्याचं नाव न घेता उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे, अप्रत्यक्षपणे सामंत यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला होता.
त्यामुळे शिवसेनेनं अखेरीस कारवाई केली आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. यानंतर शिवसेनेने बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे आता शिवसेनेतून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, उदय सामंत आणि यशवंत जाधव हे शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते. मात्र, बंडखोरी करत या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग घेतला. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. यामुळे सध्या राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.