एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं आणि तेव्हापासून अनेक निर्णय या नवीन सरकारने घेण्यास सुरुवात केली. तसेच मागील सरकारच्या अनेक कामांना स्थगिती देखील दिली आहे. नुकतेच शिंदे सरकारने अजित पवार यांना धक्का दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर देखील अजित पवार यांच्या कार्यशैलीत बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून दिवस उजाडताच ते बारामती मतदार संघात विकास कामांची पाहणी करीत आहेत.
असे असताना शिंदे सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे सरकारने अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. तब्बल ९४१ कोटींच्या नगरविकास विभागांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
मार्च ते जून २०२२ मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यात एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचे वितरण झाले होते. या कामांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्यामुळे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मोठा दणका बसल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे, तर शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय देण्यात आला आहे. त्यामुळे एक निर्णय असला तरी शिंदे सरकार दुहेरी उद्देश साधत असल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभेतील बहुमताच्या दरम्यान सर्वांनीच अजित पवार यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले होते. असे असतानाही त्यांनीच मंजुर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. शिवाय राष्ट्रवादीकडून शिवसेना आमदारांनाच निधी दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या.
त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदारांच्या निधीला स्थगिती आणि शिवसेनेच्या आमदारांच्या कामाला मात्र अभय यामधून शिंदे सरकराने दुहेरी उद्देश साधला आहे असे बोलले जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील कामांना यापूर्वी शिंदे सरकारने दणका दिला आहे.