Share

मोदी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळू शकते संधी

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाच राज्यांपैकी चार राज्यात विजय मिळाला. आता या विजयानंतर भाजपने हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या दोन राज्यांबरोबरच भाजपला सलग दुसऱ्यांदा साथ देणारा व लोकसभेची ‘किल्ली’ मानला जाणारा उत्तर प्रदेश, मुंबई महापालिका निवडणूक व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्याची दिल्लीची महत्वाकांक्षा पाहता या संभाव्य विस्तारात मुंबई-महाराष्ट्रालाही महत्त्वाचे स्थान मिळण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे आता टीम मोदीमधील काही मंत्र्यांना घरी बसावे लागण्याची चिन्हे आहेत. राजकीय वर्तुळातील हालचाली पाहता गुजरात, हिमाचल प्रदेश बरोबरच काही मराठी नावेही ‘टीम मोदी‘ बरोबर जोडली जाण्याची चिन्हे आहेत. याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई भागातील एक खासदार, भाजप महिला मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर व राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य विनोद तावडे व राज्यातील एका अल्पसंख्यांक नेत्याची वर्णी टीम मोदीमध्ये लागण्याची शक्यता आहे.

रहाटकर व तावडे यांच्याकडील पूर्वीच्या जबाबदाऱ्या काढून घेतल्यावरही या दोघांनी शांतपणे काम सुरू ठेवले आहे. तावडे यांची तर दिल्लीत बदली केली तरी, त्यांनी हरियानाची जबाबदारी तेवढ्याच निष्ठेने सांभाळली हा त्यांचा ‘प्लस पॉइंट ठरू शकतो.

भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात तावडे यांना जे कार्यालय देण्यात आले आहे ते पाहिले तरी राष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची चुणुक मिळते. रहाटकर यांच्याकडील महिला मोर्चाची जबाबदारी काढून घेतल्यावरही पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समिती या क्र.2 च्या महत्त्वाच्या मंडळात त्यांचे स्थान अबाधित आहे.

मोदी शासनातील गेल्या आठ वर्षांतील निवडक मंत्रिमंडळ फेरबदलांकडे नजर टाकली तर, ज्या राज्यांत निवडणुका असतात तेथील कामसू खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात आवर्जून स्थान दिले जाते. त्याचबरोबर कामगिरीत कमी आढळलेल्या व आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ देण्यास केंद्रीय नेतृत्व बिलकूल मागेपुढे पाहत नाही, हे आपल्याला माहिती आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now