नुकतेच कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला. यावर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या महाविकास आघाडीवरच्या आरोपांवर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे. तसेच विरोधी देवेंद्र फडणवीस यांनाही चांगलचं धारेवर धरलं आहे. यावेळी काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारानिमीत्त ते बोलत होते.
उध्दव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी लोकांना रेशन दिलं मात्र ते शिजवायचं कसं? सिलेंडरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोकांना सिलेंडर घेणंचं परवडेना झालंय. त्यामुळे आधी कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा का? असा खोचक सवाल उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
फडणवीसांनी कोल्हापूरात भगव्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. नानांच्या प्रचाराला फडणवीस आले यावरून समजून जा. बोलायला काही मुद्दे नसले की भ्रम निर्माण करायचा ही त्यांची सवय आहे, असे म्हणत फडणवीस यांना टोला लगावला.
कोल्हापुरात सरकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यापुढे ही यशस्वी करायचा आहे. निवडणून आल्यावर गुण्या गोविंदाने कामं करा. रात्र वैऱ्याची आहे पण काळजी करू नका. कोल्हापूर मधून भगवा पुसेल असं कोणीही कितीही म्हणालं तरी शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून मी हे होऊ देणार नाही, असे विरोधकांना थेट आव्हान उध्दव ठाकरेंनी दिलं.
रामाचा जन्म झाला नसता तर यांच राजकारण कस चाललं असतं? ते रेटून खोट बोलत आहेत ते सत्य आहे असं वाटत आहे. आपण कशातच कमी पडत नाही आम्ही खोट बोलण्यात कमी पडतो पण कमी पडलो तरी चालेल खोट बोलणार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
महागाईवरून केंद्रावर हल्लाबोल करताना म्हणाले, एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता? त्यावेळी काही वाटतं नाही का? खोट नाट सांगून कदाचित इतर राज्यात तुमचं राजकारण चालत असेल पण महाराष्ट्रात त्याला फळं लागणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे.