महाराष्ट्रात सध्या राणा दाम्पत्य प्रकरण चांगलंच गाजत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीना मिळाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात आता अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालिस आणि मशीदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या केलेल्या हट्टामुळे त्यांना कारागृहात जावं लागलं. आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. मात्र हे प्रकरण अधिकच चिघळत जात आहे.
महाराष्ट्र राजकारण शांत झालं नाही. अशातच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला यावरून जोरदार टोला लगावला आहे. बच्चू कडू म्हणाले, ‘तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे.’असे म्हणत राणा दाम्पत्यावर टीका केली. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.
प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेनेची दादागिरी वायफळ नाही आहे. मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का? असा प्रश्न पालकमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला विचारला आहे.
तसेच म्हणाले, तुम्हाला लाज नाही वाटत, अशा पद्धतीने वागता. तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हाला. अशा पद्धतीने करणे हे योग्य नाही आहे. मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची, कोणी केली तर तुम्ही दादागिरी करता, असे आपण म्हणायचं. आम्ही एक थापड मारतो, तुम्ही उभे रहा, असाच त्याचा अर्थ झाला.
म्हणाले, शिवसेना या मुठीतील नाही आहे. सुदैव तुमचं असं आहे तुम्हाला दणके बसले नाही, तुम्ही त्यातच खुशी माना. पुढे बच्चू कडू म्हणाले, हनुमान चालीसा देशाचा मुद्दा आहे का? आपापल्या धर्मातील लोकांनी घरात, मंदीर, मस्जिदमध्ये दहा वेळा त्यांनी म्हणावे. रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही आहे. रस्त्यावर फडकाविण्याचा विषय असेल तर तिरंगा फडकावा. गरीबांची सेवा करा, रुग्णालयात जा, हनुमान चालीसाचा सात दिवसांचा सप्ताह ठेवा, आम्ही त्यांना वर्गणी देऊ, असा टोला त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला.