आज सकाळी ७ च्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक संजय राऊतांच्या मुंबईतील घरी दाखल झालं. यावेळी, सीआरपीएफ जवान देखील सुरक्षिततेसाठी होते. संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड पडल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी राऊतांवर तोफ डागली आहे. तसेच त्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
रामदास कदम म्हणाले, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न सुरू असताना संजय राऊत गप्प होते. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला ५७ टक्के निधी मिळत होता. मात्र त्यावेळी राऊत शांत होते. शिवसेना संपली तरी चालेल. पण राष्ट्रवादीवर बोलायचं नाही अशी त्यांची भूमिका होती.
राऊतांनी शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसाठी अधिक काम केलं, असं रामदास कदम म्हणाले. दरम्यान, काल जालन्याचे शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी खोतकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर खळबळ उडविणारे भाष्य केले.
खोतकर म्हणाले होते की, माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्यानं शिंदे गटात प्रवेश करत आहे. आपण ही बाब उद्धव ठाकरेंना सांगितल्याचंही ते म्हणाले. यावर आता रामदास कदम यांनी भाष्य केलं. म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मला खोतकर यांचा फोन आला होता.
खोतकर मला म्हणाले, मी मतदारसंघात जातोय. तिथे जाऊन लोकांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेईन. खोतकर यांनी घाबरून शिंदे गटात प्रवेश करत आहे असे म्हटले, त्यावर कदम म्हणाले, खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला? त्यांनी पैसे खाल्ले आहेत का, पैसे खाल्ले म्हणून ते घाबरत आहेत का, असा प्रश्न कदम यांनी केला.