राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. तर दुसरीकडे राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. ‘माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,’ असं राज म्हणाले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याचाच धागा पकडत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना पाटील यांनी थेट राज ठाकरेंना इशारा दिला आहे. ‘राज्यात दंगे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कारवाई तितकीच कठोर असेल, असं त्यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, कुणी जर जनतेला होऊनच जाऊ द्या काय ते, अशा पद्धतीने दंगे करण्यासाठी चिथावणी देत असेल, तर जनतेनं विवेक जागा ठेवून विचार करावा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर राज्य सरकार आणि यंत्रणा कठोर कारवाईसाठी सज्ज आहे, अस स्पष्ट पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काही अटी देऊन राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील कालच्या सभेला परवानगी देण्यात आली होती. मात्र राज ठाकरेंच्या कालच्या सभेत पोलिसांनी घातलेल्या अटींचं उल्लंघन झालं आहे का, तसेच राज ठाकरेंनी भाषणातून अटींचं उल्लंघन झालं आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे,
याचाच धागा पकडत माध्यमांशी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. ‘कालचं राज ठाकरेंच भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर काय आक्षेपार्ह आहे काय नाही याबाबत निर्णय घेतील आणि त्यावर अंतिम निर्णय घेतील, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.