काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या विधानामुळे आधीच राज्यभरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असे असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी माध्यमांची संवाद साधला बावनकुळे म्हणाले, काँग्रेसमध्ये ज्या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्यामुळे त्यांना वागणूक देखील वाईट मिळत आहे. पक्षातील काही चुकीच्या गोष्टींवर बोलल्यामुळे त्यांना विधिमंडळातही चौथ्या पाचव्या रांगेत बसवण्यात येते.
तसेच म्हणाले, मुख्यमंत्री असलेल्या नेत्याला अशा प्रकारची वागणूक देणे योग्य नाही भाजपात असे कधी होत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे नाराज आहेत म्हणून त्यांनी पक्षावर काही टीका केली तर ते भाजपाचे संपर्कात आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र, भाजपचे दार सगळ्यांसाठी उघडे आहेत जिथे आम्हाला गरज वाटेल तिथे आम्ही घेऊ.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. म्हणाले, बारामती मध्ये जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विकास केला असेल तर उपकार नाही केले. ४०-४० त्यांना निवडून दिले जात आहेत त्यामुळे मतदार संघाचा विकास करणे कर्तव्य आहे.
तसेच म्हणाले, बारामती मतदारसंघ महाराष्ट्रातच आहे त्यामुळे अन्य मतदारसंघाप्रमाणे भाजपाने तिथे लक्ष केंद्रित केला आहे. या ठिकाणी केवळ मी भेट देणार म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझी ‘कुळे’ काढली त्यामुळे मी आता दर तीन महिन्याला या मतदारसंघाला भेट देणार आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत ‘घडी’ बंद पडेलच, असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेचा समाचार घेतला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावं हे त्यांचे विधान हास्यस्पद आहे. पटोले यांनी पहिले आपले स्वतःचे स्थान सांभाळावे, असे बावनकुळे म्हणाले.