राज्यातील शासकीय वीज कंपन्यामध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे, तर दुसरीकडे कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे, येत्या 48 तासात राज्यात लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी आणि कामगार दोन दिवसीय संपावर गेले आहेत. 28 आणि 29 मार्च या दोन दिवसाचा हा संप आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेली आहे.
त्यांच्या संपामुळे येत्या दोन दिवसात कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. या संपामुळे देशपातळीवर वीजनिर्मिती प्रभावित होणार आहे. या संपामुळे नाशिक, पारस आणि भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच, कोराडी, खापरखेडा, आणि चंद्रपूरचे वीज निर्मिती संच देखील प्रभावित होणार आहे. त्यामुळे राज्यात 48 तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच कडक उन्हाळ्यात लोडशेडिंगचे संकट येणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
उन्हाळ्यात वाढलेले तापमान, होणारी गरमी, त्यातच 10वी 12 वीच्या परीक्षा, विविध पिकांना पाण्याची असलेली गरज या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अखंड वीज पुरवठा मिळावा म्ह्णून वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी संपावर जाऊ नये आवाहन राज्य शासनाने केले आहे.
महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी- कर्मचारी यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मेस्मा लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटलेले आहे.