स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 1900 हुन अधिक शो मिळालेला पहिला चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे.
पावनखिंड’ या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर 18 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एवढच काय तर, बऱ्याच सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लावण्यात आला.
‘पावनखिंड’ सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली भूमिका अतिशय जबरदस्त आहे. तसेच मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या पाहायला मिळाल्या.
प्राजक्ता माळी, क्षिती जोग, माधवी निमकर, समीर धर्माधिकारी, उज्वला जोग, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अंकित मोहन यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात साकारलेल्या पाहायला मिळतात. तर बाजीप्रभूंची मध्यवर्ती भूमिका अजय पुरकर यांनी अतिशय चोख बजावली आहे.
या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल चा बोर्ड लागल्याने अनेकांना सिनेमा पाहता आला नाही. नियमांमुळे अगदी 50 टक्के क्षमतेने हा चित्रपट भरला असला, तरी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.15 कोटींचा गल्ला या चित्रपटाने मिळवला आहे. रविवारी या चित्रपटाने 2.80 कोटी इतकी कमाई केलेली आहे.
चित्रपटात सह्याद्रीच्या कातळात असलेल्या ‘घोडखिंडी’ ची ‘पावनखिंड’ कशी झाली, हा प्रवास चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तोंडून ऐकायला आणि पाहायला मिळतो. चित्रपटाची सुरुवात होते, ती राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात. नदीच्या पाण्याला वंदन करतात. याचं कारण, याच पाण्यात बांदल सेनेनं आपलं रक्त सांडलं होतं.