mohan bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांनी चर्चेत असतात. अनेकदा भागवत यांची वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय देखील ठरतात. खूपदा भागवत वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतात. अशातच पुन्हा एकदा त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे,’ असं भागवत यांनी स्पष्टच म्हंटलं आहे. भागवत यांच्या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘वर्ण आणि जातिव्यवस्था या भूतकाळातील गोष्टी आहेत आणि त्या विसरल्या पाहिजेत,’ असं भागवतांनी म्हटलं आहे.
नुकताच विदर्भ संशोधन मंडळाच्या विद्यमाने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ.मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन भागवत होते. यावेळी बोलताना भागवत यांनी म्हंटलं आहे की, ‘प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा.’
पुढे बोलताना भागवत म्हणाले, ‘सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता, पण आता तो विसरला गेला आहे. मात्र, त्याचे घातक परिणाम आपल्याला पहायला मिळत आहेत. मागच्या पिढ्यांनी सर्वत्र चुका केल्या आहेत आणि भारतही त्याला अपवाद नाही.’
दरम्यान, ‘आपल्या शास्त्रांमध्ये सामाजिक विषमतेला, उच्चनीचतेला स्थान नाही. उच्च कर्म असलेला शूद्र ही श्रेष्ठ आहे आणि नीच कर्म असलेला ब्राम्हण ही श्रेष्ठ नाही. तसेच याबबल जेनेटिक्स असं सांगतात की, 80-90 पिढयांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह होत होते. मात्र त्यानंतर ते बंद होऊ लागले, असं सांगतानाच भागवत यांनी अप्रत्यक्षपणे आंतरजातीय विवाहांचं समर्थन केलं.






