आघाडीत बिघाडी! …तर मी तुमची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला थेट इशारा

तीन वेगळ्या पक्षानी मिळून स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य. एकाच सरकारमध्ये काम करत असले तरी अनेक नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत, तर अनेक नेते हे आपल्याच सरकारमधील पक्षावर टीका करत आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नाव न घेता सेनेला लक्ष केले आहे. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एका उद्घाटनादरम्यान आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

रविवारी रात्री कळव्यातील वाघोबानगरमधील कारगील परिसरात २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनानंतर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. राजकारणासाठी सर्वसामान्यांचा पाणीपुरवठा खंडित केला तर मी त्यांची हाडे मोडेन,’ असा सज्जड इशारा त्यांनी सेनेला दिला आहे.

ते म्हणाले, ‘एखाद्या विभागातून मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. करीतही नाही; पण पाण्याच्या टाकीसाठी निधी आणि जागा आपण मिळविल्यानंतर त्याचे श्रेय जर कोणी केवळ महापालिकेत आपली सत्ता आहे म्हणून घेणार असेल तर जनता अशा बाबींवर विश्वास ठेवत नसते.’

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ‘मते मिळाली नाही म्हणून पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण आपण कधीच केले नाही; मात्र असे प्रकार भास्करनगर, पौंडपाडा भागात घडतात, असे आव्हाड म्हणाले. व्हॉल्व्ह बंद करून, शौचालयांना लॉक लावण्याचे राजकारण मी केले नाही. लोक घाबरून मते देतीलही; परंतु त्यांचे आशीर्वाद मिळणार नाहीत, असे ते म्हणाले.

दरम्यान, ठाण्यात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी शिवसेनेचे शाखाप्रमुख अंकुश गुरव, अक्षय अंकुश गुरव, उपशाखाप्रमुख रामअवतार यादव, संजय चौगुले, इस्माईल हक, दिलीप रजक, राहुल सिंग, संदीप शर्मा, नीतेश गौड, राहुल दुबे आणि राजेश राजभर या शिवसैनिकांनी सेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा स्वत:च्याच लग्नात मंगळसूत्र घरी विसरला होता ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, स्वत:च सांगितला फजितीचा किस्सा
जेव्हा तोंडावरील जखमा लपवण्यासाठी चष्मा घालून अवॉर्ड नाईटला पोहोचली होती ऐश्वर्या, सलमानसोबत झाले होते भांडण?
अमृता सिंहला घटस्फोट दिल्यानंतर करिनाला डेट करत होता सैफ, राणी मुखर्जीने दिला होता ‘हा’ सल्ला
राज ठाकरेंचं संजय राऊतांबद्दल मोठं विधान, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ