Share

दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यासोबत काम करावं लागत होतं म्हणून बंडखोरी केली- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होते. यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांच्यासोबत बंड करून आलेल्या आमदारांसाठी आपली काळजी व्यक्त केली. तसेच त्यांच्यासाठी वेळ आलीच तर मी टोकाचं पाऊल उचलेन असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकजण सत्ता मिळावी यासाठी सगळं काही सोडतात. मात्र आम्ही विचारांसाठी सत्ता सोडली. बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या विचारासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. एकाचवेळी ५० आमदार सत्तेतून बाहेर पडतात ही साधीसुधा घटना नाही. ही ऐतिहासिक घटना आहे.

शिवसेनेचे ४० आमदार सरकारमधून माझ्यासोबत बाहेर पडले, ८ ते ९ मंत्र्यांनी सत्ता सोडली. १० अपक्षांनी साथ दिली. इतके आमदार, मंत्री एका माणसावर विश्वास टाकतात ही साधी गोष्ट नाही. त्याचा विचार होण्याची गरज आहे. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.

तसेच म्हणाले, आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या या आमदारांवर मी कोणत्याही प्रकारची आच येऊ देणार नाही. त्यांचं नुकसान होऊ देणार नाही. माझ्यासोबत राहून त्यांचं नुकसान होतंय असा विचार जेव्हा माझ्या मनात येईल, तशी वेळ आलीच तर मी टोकाचं पाऊल उचलेन.

तसेच अडीच वर्षांत घडलेल्या गोष्टीवर शिंदे यांनी भाष्य केलं. म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान होऊनही आम्हाला सत्तेत असल्यानं गप्प राहावं लागत होतं. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यांसोबत काम करावं लागत होतं. शिवसैनिकांचं खच्चीकरण सुरू होतं. अनेकांना तडीपार करण्यात आलं. हे सगळं आपलंच सरकार असताना घडत होतं. त्यामुळेच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे शिंदे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now