शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाच्या ताफ्यावर काल पुण्यात हल्ला करण्यात आला. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते, तेव्हा कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला होता. यावर आता माजी मंत्री गुलाबराव पाटील अधिक आक्रमक झाले आहेत.
माजीमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदारांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेतला असला तरी अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक आमदार हे आक्रमक झाले आहेत.
प्रसार माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा चुकीचा आणि लोकशाहीला लाजवणारा आहे. विचारांची लढाई ही अशा पद्धतीने बदला घेऊन लढली जात नसते. त्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुकीत तुम्ही त्याला पराभूत करू शकता.
सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आम्ही शांत आहोत, पण हतबल नाही. त्यामुळे हे प्रकार ताबडतोब थांबले पाहिजेत आणि या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तर सत्तार यांनी आम्हीही रस्त्यावर उतरून हल्ले करू, असा इशारा दिला आहे.
तसेच गुलाबराव पाटील म्हणाले, उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यात झालेला हल्ला हा निंदनीय आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. एखाद्या व्यक्तीचा विचार किंवा त्याने घेतलेला निर्णय तुम्हाला पटला नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर हल्ला करणार का? असा सवाल त्यांनी केला.
आपल्याकडे लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने निवडणूकीत तुम्ही याचा बदला घेऊ शकता, पण ते न करता गाडीवर हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. यावर आम्ही अगदी शांतपणे विचार करतो आहे, पण याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा होत नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.