Share

‘गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?’ राज ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यात आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. यावर आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यात हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना आझानसाठी मशिंदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला. तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

एवढेच नाही तर, मशिदींवरील भोंगे उतरावा, अशी मागणी देखील त्यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली. राज ठाकरे यांनी केलेल्या या मागणीला भाजपच्या नेत्यांनी देखील सहमती दर्शवली. यावर आता अबू आझमी यांनी हिंदू सणांचा संदर्भ देत त्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या डिजेमुळे ध्वनिप्रदूषण होते असा मुद्दा उपस्थित करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अबू आझमी म्हणाले, मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल , तर गणपती,नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का? असा सवाल उपस्थित केला. तसेच, म्हणाले राज ठाकरे केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर आणि भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राज ठाकरेंच्या या भूमिकेला जनता थारा देणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर त्या भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा भाषणावेळी दिला होता. यावर देखील अबू आझमी यांनी उत्तर दिलं आहे.

म्हणाले, मशिदींपुढे हनुमान चालीसा लावणाऱ्यांना आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, कारण धार्मिक तेढ निर्माण करणारं राजकारण आम्हाला नको आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, अबू आझमी यांनी राज ठाकरे हे हरलेले, थकलेले नेते आहेत, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now