हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसून येत आहे. या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर धनंजय महाडिक यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना ३३ मते मिळाली आहे.
‘राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याच पुन्हा एकदा निदर्शनास आलं आहे.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याबाबत भाष्य केलं आहे. “राज्यसभेच्या निवडणुकीत देवेंद्र भुयार, संजय शिंदे आणि श्यामसुंदर शिंदे या आमदारांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीलाच मतदान केले आहे,” असं म्हणत राऊत यांनी केलेले आरोप अनिल भाईदास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
‘यामुळे अपक्ष आमदारांवर आरोप करण्यापूर्वी संशोधन झालं पाहिजे,’ अस म्हणत भाईदास पाटील यांनी राऊत यांना लक्ष केलं. तर दुसरीकडे देवेंद्र भुयार यांनी याच प्रकरणावरून ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. आपल्या मनातील व्यथा वेदना त्यांनी पवारांच्या कानावर टाकल्या. पवारांची भेट घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर राऊत यांनी माझ्यावर आरोप केला. म्हणून मी शरद पवार यांना भेटलो. त्यावेळी तू पहिल्यापासून आमच्याबरोबर आहेस. तुझ्याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, असं पवारसाहेब मला म्हणाले असल्याच भुयार यांनी सांगितलं.
दरम्यान, पुढे बोलताना भुयार यांनी म्हंटलं आहे की, “राज्यसभेनंतर घडलेल्या प्रकरणावर पक्षातील नेत्यांशी तसेच सेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलून मी खुलासा मागवतो”, असं वचन शरद पवारांनी दिल असल्याच भुयार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.