दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही; ‘या’ क्रिडापटूचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या हिंसाचारप्रकरणी महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका विशिष्ट समाजावर नाव न घेता तिनं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दिल्लीत जहांगीरपुरा परिसरात जो हिंसाचार झाला, यासाठी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारण सुरू आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा असा हिंसाचार होऊ नाही.

तर दुसरीकडे या हिंसाचारप्रकरणी बबिता फोगाटने ट्विट केले आहे. ट्विट वरून तिनं आपलं मत मांडलं आहे. ट्विटमध्ये तिनं लिहिले आहे की,’हिंदू समाज कधीही दंगली करत नाही. दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाला त्या समाजाची ओळख असते. मग उमर खालिद, शरजील इमाम, ताहिर हुसेन आणि आता अन्सार, सलीम, इमाम शेख, दिलशाद, अहिद आणि अस्लम आहेत.’


तसेच या हिंसाचाराप्रकरणी बबिताने आणखी एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये लिहिले की, दिल्ली दंगल ‘आम आदमी पार्टी’ ने घडवून आणली आहे. आप हा गुंड आणि गुन्हेगारांचा पक्ष आहे. ज्या ‘आप’ पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. शाहीनबागच्या दंगलीत हे सिद्ध झाले होते आणि तपास पूर्ण झाल्यानंतर जहांगीर पुरी दंगलीतही हे सिद्ध होईल.

यावेळी तिनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. म्हणाली, जेएनयूमधील देशद्रोहींशी केजरीवाल यांचे संबंध आहेत. शाहीनबागच्या दंगलखोरांशी केजरीवाल यांचे नाते. जहांगीरपुरीच्या दंगलखोरांशी केजरीवालांचे संबंध. या नात्याला काय म्हणतात? असे सवाल फोगाटने यावेळी केले आहेत.

दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी देशभरात राजकारण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. या हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या बेकायदेशीर घरांवर आणि मालमत्तांवर कडक कारवाई करत, बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली.