महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हावर काहीही निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी ठाकरे गटातून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती.
मात्र, कोर्टाने ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीत स्थगिती नसेल, असा निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. खडसे यांनी आज आपल्या जळगावातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
खडसे यांनी कोर्टाच्या निर्णयावर बोलताना दिवंगत काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील एका घटनेचा दाखला दिला. म्हणाले, इंदिराजींच्या वेळी काँग्रेस पक्षामध्ये फूट झाली होती. पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करण्यात आला होता. त्यावेळी पक्षांतरबंदी कायद्यानुसार ते योग्य होते.
पण अलीकडे या संबंधीच्या १०व्या परिशिष्टात सुधारणा झाली असून पक्षातून बाहेर पडल्यानंतर वेगळा गट स्थापन केला पाहिजे अथवा दुसऱ्या पक्षात विलीन होणं गरजेचं आहे, असे खडसे म्हणाले. तसेच म्हणाले, आजचा निर्णय पाहिला तर हा निर्णय कोणा एकाच्या बाजूने लागला असं म्हणता येणार नाही.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतंच मराठा आरक्षणाविषयी संतापजनक वक्तव्य केलं होतं. यावर खडसे यांनी पप्रतिक्रिया दिली. म्हणाले, तानाजी सांवंत यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभर रोष पसरला असताना त्यांनी ज्या पद्धतीने सशर्त माफी मागितली आहे, ती चुकीची आहे. त्यांनी बिनशर्त माफी मागायला पाहिजे होती, असे खडसे म्हणाले.