देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. अचानक आलेल्या या मेसेजमुळे अनेकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. यामुळे हा मेसेज कशासाठी आला असा प्रश्न उपस्थित झाला होता.
असे असताना मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती.
या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला.
यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला. आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असे विचारण्यात आले.
तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला. विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही. यामुळे याचीही चर्चा सुरू आहे.