ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेची शिवसेना-राष्ट्रवादीवर जहरी टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा सरकारला दिला. यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचबरोबर आरोप – प्रत्यारोप सुरू असतानाच काल हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खालकर चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती पार पडली आहे.

यानंतर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना वेग आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते सदा सरवणकर यांच्या माध्यमातून शिवसेनेकडून दादरमध्ये अशीच महाआरती पार पडली. तसेच या कार्यक्रमाचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

तसेच गिरगावातील सीपी टँक इथल्या हनुमान मंदिरात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते महाआरती पार पडली. महाआरतीनंतर हनुमान चालीसा पठणातही त्यांनी सहभाग घेतला. शिवसेना आणि मनसेच्या हनुमान जयंतीच्या महाआरतीला दोन्ही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली.

तर दुसरीकडे सेनेनं महाआरतीचं आयोजन केल्यानंतर मनसेने शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे. सध्या देशपांडे यांच्या ट्विटच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. वाचा काय आहे ट्विट?

”संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते, सहजच आठवलं त्याचा नास्तिकांनी आणि नव पुरोगाम्यांनी केलेल्या महाआरतीशी संबंध नाही,” असे म्हणत देशपांडेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे.

दरम्यान, काल पुण्यात हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज यांनी भगवी शाल पांघरून त्यांनी आरती केली. त्यामुळे मनसेची दिशा काय असणार अशी चर्चा सध्या राज्यात चांगलीच रंगली आहे. तसेच यावेळी मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

याचबरोबर हनुमान चालिसा पठण कार्यक्रमामध्ये राज ठाकरे  सहभागी झाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करत पोस्टरबाजी केली आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्त्वाच्या बातम्या