पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी काल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. असे असताना , मातोश्रीवर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नेतृत्वात ठाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड केल्यानंतर ठाण्यातील खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले. आता पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या राजन विचारे यांनी लिहिलेले हे पत्र व्हायरल झालं आहे. धर्मवीर आनंद दिघेंना उद्देशून राजन विचारे यांनी हे भावनिक पत्र लिहिलं आहे. आपल्याच माणसांनी घात केल्याचं दु:ख असून ‘ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद पुसू देणार नाही असं विचारे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
राजन विचारे यांनी पत्रात लिहिले आहे की, पत्रास कारण की, साहेब आज तुमची खूप आठवण येतेय. साहेब आज तुम्हाला जाऊन २१ वर्षे उलटली. असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण आज तुमची जरा जास्तच आठवण येते आहे साहेब.
तसेच लिहिले, वयाच्या सोळाव्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो, या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझ्यासोबत अजूनही आहात, अंधारात वाट दाखवत, धगधगत्या दिव्यासारखे , पण साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे. तितका कधीच नव्हतो.
आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही, फक्त शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुद्धा अस्वस्थ झाला आहे. आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला ! तो पण आपल्याच लोकांकडून. म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब.
तसेच पत्रात पुढे लिहितात की, साहेब आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. ह्याच मंदिरात आम्हा सगळ्यांना शिवबंधन बांधलं होतं तुम्ही. आज तेच बंधन माझ्या डोळ्यासमोर तुटताना बघतोय म्हणून गहिवरून येतंय साहेब. तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायेत.
पण रडायचं नाही , लढायचं. हा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना आहे आपली. साहेब शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करताना पाहिलंय तुम्हाला. म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब, अशी भावना राजन यांनी व्यक्त केली.
पण साहेब काळजी नसावी, कोणत्याही पदापेक्षा, वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्वाची, पक्ष महत्वाचा. तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन .पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या, पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा.






