राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला आता हिमाचल प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हर्ष महाजन यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे दिल्ली दरबारी वजन वाढलेले महाराष्ट्रातील नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे देखील यावेळी उपस्थित होते.
हर्ष महाजन हे हिमाचलमधील काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा आहेत. हर्ष महाजन २००३-०८ या काळात वीरभद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. हर्ष १९९३ ते २००७ या काळात चंबा विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार राहिले आहेत.
याशिवाय, २००७ पासून माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांची निवडणूकही महाजन यांनी हाताळली होती. दरम्यान, हर्ष महाजन यांनी भाजपप्रवेशावेळी काँग्रेस दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाल्याची टीका केली. तसेच म्हणाले, मी ४५ वर्षे काँग्रेसमध्ये होतो, पण आता पक्षाकडे ना दूरदर्शीपणा राहिलाय ना कार्यकर्ते असे महाजन म्हणाले.
Former Working President of Himachal Pradesh Congress Shri Harsh Mahajan joins BJP in the presence of senior party leaders at party headquarters in New Delhi. #JoinBJP pic.twitter.com/sUzWePSMFH
— BJP (@BJP4India) September 28, 2022
हिमाचल प्रदेशातील काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधताना दिल्लीप्रमाणेच राज्यातही मायलेकाचे राज्य असल्याचं महाजन म्हणाले. ‘वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह आता प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह हे पक्षाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये काहीही दम उरला नाही’ असे महाजन म्हणाले.
दरम्यान, हर्ष महाजन यांचे स्वागत करताना पियुष गोयल यांनी त्यांचं कौतूक केले. म्हणाले, हर्ष महाजन यांनी काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली असून त्यांनी स्वच्छ प्रतिमा राखली आहे. तसेच या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यात सत्ता टिकवून भाजप इतिहास रचणार असल्याचा दावाही गोयल यांनी यावेळी केला.