राजधानी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचे संम्मेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. दरम्यान, त्यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती असे म्हणत भाजपवर टीका केली. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार ढोंगीपणा करत असल्याचं म्हटलं आहे.
काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रपोगंडा उभा केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती. मात्र ज्या लोकांच्या हातात सत्ता तेच प्रचार करीत आहेत. या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून, देशात विषारी वातावरण निर्माण करत आहे असे शरद पवार म्हणाले होते.
तसेच म्हणाले होते की, दुःख याचं आहे की पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असोत त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरू असताना एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. सगळे चित्रपट पाहिला गेले होते. जर असंच सुरू राहिलं तर देशात एकता राहणार नाही.
यावर आता ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी एका फ्लाइटमध्ये त्यांची आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल सांगितले आहे. भेटीदरम्यान शरद पवार यांनी माझे चित्रपटाबद्दल अभिनंदन केल्याचं त्यांनी सांगितले आहे.
ट्विट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, मी काही दिवसांपूर्वीच एका फ्लाइटमध्ये श्री. शरदजी पवार आणि त्यांच्या पत्नीला भेटलो, त्यांच्या चरणांना स्पर्श केला. या दोघांनी माझे आणि पल्लवी जोशी यांचे चित्रपटाबद्दल अभिनंदन केले आणि आशीर्वाद दिले. मीडियासमोर त्याचं काय झालं माहीत नाही. त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असला तरीही मी त्यांचा आदर करतो.
I met Shri @PawarSpeaks ji and his respected wife just s few days ago in a flight, touched their feet and both of them congratulated and blessed me and Pallavi Joshi on the film. Don’t know what happened to him in front of media. Despite blatant hypocrisy, I respect him https://t.co/HHQh9nLZvg
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 1, 2022
विवेक अग्निहोत्री यांनी शरद पवार यांना दिलेल्या सडेतोड प्रतिक्रियेमुळे आता भाजप या गोष्टीचा फायदा घेणार का हे पाहाणं आवश्यक आहे. याआधी देखील विवेक अग्निहोत्री यांनी खोट्या राजकारणाच्या काळात तरुणांनी एकजूट व्हावं या शरद पवार यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देत म्हटलं होतं की, आदरणीय शरद जी भारतात इतकी गरिबी का आहे हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असेल. देव तुम्हाला दीर्घायुष्य आणि सदबुद्धी देवो.