सध्या मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर राणा दाम्पत्याने माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर ते अखेर नरमले. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी शिवसेनेच्या हिसक्याला घाबरत माघार घेतली आहे. शिवसेनेच्या हिसक्याला घाबरलेल्या राणा दाम्पत्याने माघार घेताना मोदींचा आधार घेतला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे.(After the return of Rana, the storm of Shiv Sainiks erupted)
बिस्लेरीची अर्धी बाटली बंटी बबलीची फुलऑन फाटली अशा घोषणा शिवसैनिक देत आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या माघारीनंतर शिवसैनिकांनी ही नवीन घोषणा शोधून काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याला उद्देशून बंटी बबली हा शब्दप्रयोग वापरत आहेत.
कालपासून शिवसैनिकांनी मातोश्रीवर खड़ा पहारा दिला होता. राणा दाम्पत्याच्या घराजवळही प्रचंड संख्येने शिवसैनिक जमले होते. त्यांना घराबाहेर पडणंही कठीण झालं होतं. त्यांना डिवचण्यासाठी शिवसैनिकांनी रूग्णवाहीकाही आणली होती. अगदी 92 वर्षांच्या आज्जी देखील पहारा देण्यासाठी मातोश्रीवर आल्या होत्या.
शिवसैनिक राणांना हनुमान चालिसा वाचण्यासाठी मातोश्रीवर येण्याचे चॅलेंज देत होते. आल्यावर त्यांना महाप्रसाद देणारच असे म्हणत शिवसैनिकांनी गर्भित इशाराही दिला होता. अखेर आक्रमक शिवसैनिकांपुढे राणा दाम्पत्य घाबरले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना दुषणे देत माघार घेतली. यावेळी पुन्हा एकदा मुंबईतील शिवसेनेची ताकद दिसून आली.
आंदोलन मागे घेत असताना आमदार रवी राणा म्हणाले की, “आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. आम्ही भक्तिभावाने मातोश्रीसमोर जाणार होतो. पण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दडपशाही चालवली आहे. शिवसैनिकांनी आमच्या अमरावतीमधील घरावर हल्ला केला. दगडफेक केली. मुंबईतील आमच्या घरासमोर शिवसैनिक आंदोलन करत आहेत.
“मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात. मुख्यमंत्र्यांना अहंकार आहे. शिवसेनेचे जेवढे आमदार, खासदार निवडून आले आहेत ते पंतप्रधान मोदींच्यामुळे निवडून आले आहेत. पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईत दौरा आहे. या दौऱ्यात विघ्न नको म्हणून मी माघार घेत आहे”, असे आमदार रवी राणा म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्टरातील जनता त्रस्त झाली आहे. मातोश्री आमच्या हृदयामध्ये आहे. बाळासाहेब ठाकरे देखी आमच्या हृदयामध्ये आहे. मी कुठलं चुकीचं भाष्य वापरलं नाही. पण मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी शिवसैनिकांना पाठवलं आहे, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा आक्रमक पवित्रा घेत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला होता.
मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांना यासंदर्भात नोटीस देखील बजावली होती. तरी देखील राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक कालपासून नवनीत राणा यांच्या खार येथील घरासमोर ठाण मांडून होते.