आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये पुन्हा एकदा युवा खेळाडूंनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट क्षेत्रात आपलं नाव कमावले आहे. आयपीएलमध्ये अनेक फलंदाज आणि गोलंदाजांचे कौतुक करण्यात आले. या खेळाडूंमध्ये असे दोन खेळाडू आहेत जे भारतीय संघात लवकरच पाहायला मिळणार आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या उत्तम कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघात लवकरच दोन खेळाडू पाहायला मिळतील असे भाकीत केले आहे.
रवी शास्त्री यांच्या मते, यंदाच्या आयपीएलमध्ये या दोन खेळाडूंनी फलंदाजीपेक्षा गोलंदाजी मध्ये मने जिंकली आहेत, म्हणून लवकरच हे दोन गोलंदाज भारतीय संघात दिसणार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी हे दोन खेळाडू कोण असणार जे भारतीय संघात दिसणार याबद्दल देखील खुलासा केला आहे.
रवी शास्त्री यांनी सांगितले की, पंजाब किंग्जचा अनकॅप्ड रिटेन केलेला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि सनरायझर्स हैदराबाद चा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हे दोघे लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा भाग होणार आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता क्रिकेट क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली लागली आहे.
रवी शास्त्री म्हणाले की, अर्शदीप सिंग खूप चांगली गोलंदाजी करत आहे आणि शेवटच्या षटकामध्येही तो चांगली गोलंदाजी करत आहे. त्यामुळे सगळ्यांची मनं त्याने जिंकली. तर, उमरान मलिक हा खेळाडू 150 च्या वर उत्कृष्ट चेंडू टाकण्यास सक्षम आहे. तसेच सुरुवातीला काहीसे महाग पडल्यानंतर या खेळाडूने मॅच विनिंग विकेट्स काढल्या आहेत.
त्यामुळे दोघांची आयपीएल मधील कामगिरी पाहता दोघेही लवकरच भारतीय संघात सामील होतील असे रवी शास्त्री यांना वाटते. तसेच, ब्रायन लारा म्हणाला की, उमरान मलिक मला फिडेल एडवर्ड्सची खूप आठवण करून देतो. तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणार आहे. मला आशा आहे की तो नंतरच्या अनुभवासह त्याच्या गोलंदाजीत थोडे अधिक वैविध्य आणेल.