मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी सभा झाली. त्यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली. आजपर्यंत ते शिवसेनेवर विविध मुद्यांवरून टीका करत आहेत. राज ठाकरे शिवसेनेवर एवढी टीका करत असताना शिवसेनेच्या एका नेत्याने मात्र राज यांचे कौतूक केले आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. राज ठाकरेंच्या भाषणाकडे गांभीर्याने पाहावे, त्यांच्या भाषणाची चेष्टा करू नये, असे म्हणत भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांचे कौतूक केले आहे.
भास्कर जाधव म्हणाले, राज ठाकरेंच्या भाषणाकडे गांभीर्याने पाहावे. राज ठाकरेंच्या भाषणाची चेष्टा करू नये. एक परिपक्व राजकीय भाषण म्हणून त्याकडे पाहावं. शिवसेनेवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचे भास्कर जाधवांनी कौतुक केल्याने आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भाषणावरून राज यांना टोला लगावला होता. म्हणाले होते की, राज ठाकरे यांच्या भाषणातून त्यांना आलेली निराशा दिसून आली. राज ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेवर बोलू नये. ते काय करणार आहेत, किंवा काय करतायत, याविषयी त्यांनी बोलावं.
तसेच म्हणाले, शिवसेनेच्या हिंदुत्वावर राज ठाकरेंनी बोलू नये, त्यांनी हिंदुत्वाची शाल कधीपासून पांघरली, याचं स्पष्टीकरण द्यावं. राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज आहे. एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं. माणसाला एकदा निराशेने ग्रासलं की तो काहीही बोलतो, असे संजय राऊत म्हणाले होते.
तसेच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या की, पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला.