ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने नवरदेवाने मुलीच्या आई-वडिलांना सोने आणि पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. मुलीचा लग्नास विरोध होता, तरीही तिचे लग्न लावून देण्यात आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत बाल विवाहाचा प्रकार समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचे तिच्या आईवडिलांनी मुंबईतील एका ४२ वर्षाच्या व्यक्तीबरोबर लग्न ठरवले होते. या मुलीची इच्छा नसताना देखील हा प्रकार करण्यात आला. यामध्ये नवरदेव दोन तोळ्यांचे दागिने तसेच खर्चासाठी एक लाख रुपये देण्यासह लग्न सोहळ्याचा सर्व खर्चही नवरदेवच करणार होता.
मुलीचा साखरपुडा झाल्यानंतर लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मुलीचा विरोध वडिलांनी ऐकला नाही. मुलीने तेथील लोकांना माझे लग्न जबरदस्तीने लावून देत आहेत. यातून मला वाचवा असे सांगितले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने या लग्नास मुलीच्या पालकांनी संमती दिली असली तरी मुलीचा विरोधा होता.
या मुलीचे लग्न देखील लावले गेले. मात्र सायंकाळी ४ वाजता अचानक त्याठिकाणी पोलिस दाखल झाल्यानंतर एकच पळापळ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. पोलीस येताच काहीजण तेथून पळूनही गेले.
यामध्ये मुलीचे वडील काकीसह अन्य नातेवाईक आणि नवरदेव, त्याचा भाऊ आणि इतर अशा एकूण आठ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलीस तपास करत आहेत.