उद्योगमंत्री उदय सामंतांना जाळून टाकणार; जाहीर धमकीने राजकीय वर्तूळात खळबळ

एकीकडे राज्यातील राजकारण तापलेलं आहे. असं असतानाच दुसरीकडे मात्र नेत्यांना धमक्या देण्याच प्रमाण देखील वाढलेलं पाहायला मिळत आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे.

यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र जोशी यांनी रत्नागिरीतील गोवळा इथं रिफायनरी विरोधी संघटनेच्या हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. विशेष बाब म्हणजे, जोशी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोर हे वादग्रस्त विधान केलं आहे.

वाचा नेमकं घडलं काय..?
काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजापूर दौऱ्यावर होते. याच दौऱ्यावेळी एक धक्कादायक बाब घडली. रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

‘त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू,’ अशा शब्दात जोशी यांनी थेट सामंत यांना धमकी दिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातले आहे. याचबरोबर मंत्री सामंत यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याच देखील पाहायला मिळत आहे.

वाचा नेमकं नरेंद्र जोशी यांनी सामंत यांना धमकी देताना काय म्हंटलंय?
“मुंबईला असताना गावी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. मात्र कोणत्या आधारावर गुन्हे दाखल करता? आमचं गाव, आमची जागा, आमचं भविष्य आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही. कोणता तरी मंत्री सांगतोय म्हणून गुन्हे दाखल केले जातात. त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू,’ असं जोशी यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना जोशी यांनी म्हंटलं आहे की, ‘आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे, आमच्या पंचकृषीत कुणी पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या आंदोलनाची पहिली गोळी हा नरेंद्र जोशी स्वत:च्या अंगावर घेईल, पण हा प्रकल्प होऊ देणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका यावेळी बोलताना जोशी यांनी घेतली.