मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिंदे गटात मंत्रिपद न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही बच्चू कडू गैरहजर होते.
त्यामुळे नाराजीच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते. अखेर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडू विधानभवनात दाखल झाले. पहिल्या दिवशी गैरहजर असलेले बच्चू कडू मात्र दुसऱ्या दिवशी विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत.
कडू यांनी सरकारच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणावरून टीका करताना म्हंटलं आहे की, ‘पावसाने जेवढं झालं नाही त्यापेक्षा जास्त सरकारच्या धोरणामुळे नुकसान होतय. आम्ही सगळे मिळून कसायासारखे शेतकऱ्याला हळूहळू कापतो ते दिसत नाही. आम्ही सगळेच नालायक, आमच्याएवढे नालायक कुणीच नाही.’
‘जखम झाल्यावर त्यावर मीठ टाकणारी आपण औलाद आहोत. उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं अशा जहरी शब्दात कडू यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू हे रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढण्यावरून देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘रोजगार हमी योजनेची व्याप्ती अधिक वाढवा. विधवा भगिणी असो वा अपंग बांधव यांना रोजगार हमी योजनेत आणण्याचा निर्णय घ्या. वाटलस पुन्हा एकदा गुवाहाटीला जावू. लावा छातीला माती, असंही कडू यांनी म्हटलं आहे. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कडू चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यामध्ये त्रुटी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून त्याबद्दल सांगणार आहे. अतिवृष्टीच्या अटी ठेवल्या आहेत, त्यात बदल केले पाहिजे, व्यक्तीगत हिताकरता मी नाराज नाही, असं कडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.