अध्यात्माची आवड असणाऱ्या आजीने एकादशीला आपल्याला मरण यावं यासाठी टोकाचं पाऊल उचललं आहे. आजीने स्वतः च्या अंगाला तूप लावून पेटवून घेतलं आहे. ही भयंकर घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे.
अध्यात्माची आवड असणाऱ्या ८० वर्षाच्या आजीने अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २४ तारखेला घडली. आत्महत्या करणाऱ्या या आजींचे नाव कावेरी भास्कर भोसले असे आहे. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
घटने संदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीला हृदयाचा त्रास होता, तसेच दम्यावरही उपचार सुरू होते. त्यांना आध्यात्माची अतिशय आवड होती. दिवसभर त्या हरिपाठ, भजन, पारायण, पोथी वाचन यात रमत असत. घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील त्यांनी नित्यनेमाने हरिपाठ केला. भजन केले अन् वरच्या रूममध्ये झोपायला गेल्या.
माहितीनुसार, आध्यात्मिक अभ्यास असलेल्या आजीने एकादशीला मृत्यू यावा अशी भावना अनेकदा बोलून दाखवली. २४ तारखेच्या रात्री १० च्या सुमारास त्यांनी हरिपाठ म्हटला. कुटुंबियांना आता तुम्ही झोपा असे सांगत वरच्या मजल्यावर गेल्या.
त्यानंतर त्यांनी अंगाला गावरान तूप लावले. बाथरूममध्ये जात देवाचा धावा करीत स्वतःला पेटवून घेतले. ओरडण्याचा आवाज आल्यावर मुलगा तसेच सुनेने वरच्या मजल्यावर धाव घेतली. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या आजारपणाला कावेरी भोसले कंटाळल्या होत्या. त्यांना हृदयाचा आजार होता. एका खाजगी रुग्णालयात खूप दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यात त्यांना आता ढगाळ वातावरणामुळे अधिक त्रास व्हायचा, त्यामुळेही त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.