एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदारांसह गुवाहाटी येथे काही दिवसांपासून स्थान मांडलं आहे. तेथे या बंडखोर आमदारांवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रश्न उपस्थित करून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
अनिल गोटे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर गुवाहाटी येथे कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. या आमदारांचा गुवाहाटीतील खर्च कोण करत आहे, असा सवाल गोटे यांनी यावेळी केला आहे. शिवाय या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील पत्र लिहिले असल्याचे सांगितले आहे.
अनिल गोटे म्हणाले, मी स्वत: राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन तक्रार देऊन आलेलो आहे. त्याची एक प्रत माझ्याकडे आहे. राज्यपाल यांच्यासह सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, अँन्टी करप्शन या संस्थांकडेही देखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच म्हणाले, हे सरकार गेले आणि ते सरकार आले तर सर्वसामान्य नागरिकांवर काहीही फरक पडणार नाही. उलट एक खाणारे जाऊन दुसरे खाणारे आले, एवढाच काय तो फरक असेल. त्यांनी यावेळी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा घणाघात बंडखोरांवर केला आहे.
या माणसांवर एवढा खर्च कसा? सहा फ्लाइट. दोन माणसांसाठी विशेष विमान. हा सर्व खर्च कोण करत आहे एखाद्याकडे दहा-पाच लाख सापडले की त्याच्यावर कारवाई होते. मात्र यांच्यावर काहीच कशी कारवाई होत नाही, असा सवाल अनिल गोटे यांनी केला.
फडणवीसांवर टीका करताना म्हणाले, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत कपटी, लबाड आणि कारस्थानी आहेत. त्यांचेच हे कारस्थान आहे. हा लोकशाहीचा खेळ देशाला घातक आहे. असे अनिल गोटे म्हणाले. त्यांनी बंडखोरांवर कुठून आणि कोणी खर्च केला याचा तपास लावणार असल्याचे सांगितले. गोटे आधी भाजपचे आमदार म्हणजे फडणवीसांचे सहकारी होते मात्र आता त्यांनी फडणवीसांवरच निशाणा साधला यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.