शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर आता राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘राज्यसभा निवडणुकीत मोठी दगाबाजी झाली आहे. शब्द देऊन ही दगाबाजी करण्यात आली आहे. त्यांची यादी आमच्याकडे आहे,’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. ‘देवेंद्र भुयाळ, संजय मामा शिंदे यांनी आम्हाला मतं दिलेली नाहीत,’ अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच राज्यसभा निवडणुकीत शब्द देऊनही शब्द न पाळणाऱ्यांची नोंद राज्य सरकारने केलीय,’ असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.
यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं. आघाडी सरकार स्थापन होता मला विमानाने नेलं. अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं. त्यांनी जो कागद दिला त्यापद्धतीने मतदान केलं,’ असं संजयमामा शिंदे म्हणाले.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले, ‘माझ्यावर संजय राऊत यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. मी घोडेबाजारातील आहे का नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारा मग आरोप केला, असं प्रत्युत्तर संजयमामा शिंदे यांनी राऊत यांना दिलं आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. काल झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.