सध्या शिवसेनेची औरंगाबाद येथे सभा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टोलेबाजी सुरू आहे. त्यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना म्हणाले की, ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते.
देशाची रक्षा करता करता औरंगजेबाने बलिदान दिलं त्याला आम्ही परकं म्हणत नाही, तो आमचा आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुस्लिम लोकांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, बाबरी पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. त्यांचा हा दावा उद्धव ठाकरेंनी खोडून काढला. उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आता सांगत आहेत, बाबरी पतनावेळी मी अयोध्येत गेलो होतो, तिकडे एकही शिवसैनिक नव्हता.
औरंगाबादमधील आमचे मोरेश्वर सावे आणि इतर शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत होते. मोरेश्वर सावे हे माजी महापौर आणि खासदार आहेत. आता मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव तुमच्याकडे येऊन आमदार झाले आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढला.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आमदार झाले आहेत. तेव्हा सावे यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सांगावे की, माझे बाबा अयोध्येला गेले होते की नव्हते. सावे ज्या फडणवीसांची पालखी वाहत आहेत त्यांच्यासमोर खरं-खोटं करावं, असं आव्हानही त्यांनी फडणवीसांना केलं.
दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच भाजपवरही हल्लाबोल केला. २५ वर्षे जे आमच्यावर मांडीवर बसलेले होते, तेच आता आमच्या छाताडावर बसलेले आहे, जे मित्र होते, ते वैरी झाले आहे, जे वैरी होते ते मित्र झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.