पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी तेलंगणातील हैदराबाद शहरात सभा पार पडली. या सभेत मोदींनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) वर घराणेशाहीचे आरोप केले होते. यावर आता तेलंगणा राष्ट्र समितीने मोदींना प्रतिउत्तर दिले आहे.
काल म्हणजेच गुरुवारी सभेत मोदी म्हणाले होते की, तेलंगणासाठीचा संघर्ष हा केवळ एका कुटुंबाच्या सत्तेसाठी नव्हता, राजकीय घराणेशाहीमुळे देशातील तरुणांना, गुणवंताना राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. परिवारवादामुळे अशा तरुणांच्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा होतो.
त्या तरुणांची राजकारणात येण्याची दारे बंद केली जातात. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर आता सीएम केसीआर यांच्या पक्षाने प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, पंतप्रधान मोदी देशाच्या पंतप्रधानांप्रमाणे बोलले नाहीत तर ते भाजपच्या नेत्याप्रमाणे बोलले.
घराणेशाहीच्या राजकारणाच्या आरोपांवर, केसीआरचा पक्ष टीआरएसचे प्रवक्ते कृशांक माने म्हणाले की, जर त्यांचा घराणेशाहीला विरोध असेल, तर भारताच्या क्रिकेटचे नेतृत्व करणारे हे जय शहा कोण आहेत? जय शाह हे क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत.
सीएम केसीआर यांनी देखील मोदींच्या आरोपांवर कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंतप्रधानांच्या आरोपांना भाषणबाजी म्हणून फेटाळून लावले. देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष वेधत ते म्हणाले, परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, मात्र दररोज भाषणे केली जात आहेत. जीडीपी घसरत आहे आणि महागाई वाढत आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले होते की, तेलंगाणातील लोक हे पाहत आहेत की जेव्हा एका कुटुंबाला समर्पित पक्ष सत्तेवर येतात तेव्हा त्या कुटुंबातील सदस्य भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे चेहरे बनतात. कौटुंबिक पक्ष केवळ स्वतःची भरभराट करतात आणि आपली तिजोरी भरतात. राजकीय घराणेशाही सत्तेतून काढून टाकली जाईल तेव्हा विकासाचे मार्ग खुले होतील, असे मोदी म्हणाले होते.






