या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे काल पुण्यात पोहोचले होते. राज ठाकरे आज पुणे येथून औरंगाबादला निघणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे उद्या होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झालेत. उद्याची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले.
यासाठी पुण्यातील राजमहाल येथे सकाळीच ब्रह्मवृंद मोठ्यासंख्येने हजर देखील झाले होते. यानंतर राज ठाकरे पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचबरोबर राज वढू इथं संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने निघालेत.
दरम्यान, याबाबत बोलताना गुरुजी मनोज पारगावकर यांनी सांगितले आहे की, “राज यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि यश प्राप्त होण्यासाठी संपूर्ण पुणे शहराच्या वतीने पुरोहित वर्गाच्या वतीने आम्ही मंत्रांद्वारे आशीर्वाद दिले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद दिला”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर दुसरीकडे कालच राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले होते. आज सकाळी अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे यांना पोलिसांनी दिलेल्या अटींबद्दल विचारले. राज यांच्या सभेला पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम घालून देण्यात आल्या आहेत. सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असं अमित ठाकरेंना विचारलं.
यावर भाष्य करताना अमित ठाकरे म्हणाले, ‘आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं मोठं विधान अमित ठाकरे राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी १६ अटी घातल्या आहे.