मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. काल रामनवमीचे औचित्य साधून मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं.
यावरून शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपले काका असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर घणाघाती टीका केली. “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेला सणसणीत प्रत्युत्तर दिले.
मनसेच्या सदर प्रकरणार बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, ‘संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. याचाच धागा पकडत आता मनसे नेत्यांनी पलटवार केला आहे.
मनसे आमदार राजू पाटील ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला राजू पाटील यांनी लगावला आहे. तसेच सध्या मशिदींवरील भोंग्यांवरील प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
दरम्यान, “शिवसेना संपली” अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच, त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून आदित्य ठाकरे खात आहेत,” असे मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
ट्विटमध्ये पुढे किर्तीकुमार शिंदे म्हणतात, ‘राहिला प्रश्न मनसेचा; मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल, असे किर्तीकुमार शिंदे यांनी यांनी थेट आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान दिले आहे. सध्या मशिदींवरील भोंग्यांवरील प्रकरणामुळे शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.